केळी लागवड Banana cultivation in India

केळी नियोजन असे कराल♥प्रगतिशील शेतकरी♥

♥हवामान :.
केळी हे उष्‍ण कटीबंधीय फळ असून त्‍यास साधारण उष्‍ण व दमट हवामान चांगले मानवते.
साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते.
हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्‍हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्‍त उष्‍ण हवामान असल्‍यास पिकावर अनिष्‍ट परिणाम होतो.
केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्‍यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्‍त झाल्‍यास केळीची वाढ खुंटते. उन्‍हाळयातील उष्‍ण वारे व हिवाळयातील कडाक्‍याची थंडी या पिकाला हानीकारक असते.
जळगांव जिल्‍हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्‍त क्षेत्र असण्‍याचे कारण म्‍हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय व उत्‍तर भारतातील बाजारपेठांशी सुलभ, थेट दळणवळण हे होय.
♥जमीन :
केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्‍त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्‍यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते.
क्षारयुक्‍त जमिनी मात्र केळी लागवडीस उपयुक्‍त नाहीत.
भुसभुशीत, उत्तम निच-याची, पोयटायुक्त, मध्यम ते भारी जमीन केळीसाठी योग्य असते. हलक्‍या, मुरमाड, क्षारयुक्त व चोपण जमिनीत केळी लागवड करू नये.
♥जाती
केळीच्‍या 30 ते 40 जाती आहेत.
त्‍यापैकी पिकवून खाण्‍यास उपयुक्‍त जाती
उदा. बसराई
हरीसाल
लालवेलची,
सफेदवेलची,
मुठडी,
वाल्‍हा लालकेळी आणि शिजवून किंवा तळून खाण्‍यास उपयुक्‍त जाती उदा राजेळी, वनकेळ तसेच शोभेसाठी रानकेळ या जाती आहेत. प्रत्‍येक जाती विषयी थोडक्‍यात माहिती खालीलप्रमाणे
हरीसाल – या जातीची लागवड वसई भागात जास्‍त प्रमाणात होते. या जातीची उंची 4 मिटरपर्यंत असते. या जातीची साल जास्‍त जाडीची असून फळे बोथट असतात, तसेच ही जात टिकाऊ आहे. प्रत्‍येक लॉगरात 150 ते 160 फळे असून त्‍यांचे वजन सरासरी 28 ते 30 किलो असते. या जातीला सागरी हवामान मानवते.
बसराई – या जातीला खानदेशी, भुसावळ, वानकेळ, काबुली, मॉरीशस, गव्‍हर्नर, लोटणं इत्‍यादी नांवे आहेत. व्‍यापारी दृष्‍टया ही जात महाराष्‍ट्रात सर्वात महत्‍वाची आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये केळीच्‍या एकूण क्षेत्रापैकी 75 टक्‍के क्षेत्र या जाती लागवडीखाली आहे. ही जात बांध्‍याने ठेंगणी 5 ते 6 फूट उंच, भरपूर प्रमाणात उत्‍कृष्‍ट व दर्जेदार फळ देणारी असल्‍यामुळे तिला बाजारात अधिक मागणी असते. या जातीला उष्‍ण कोरडे हवामान मानवते. या जातीला वा-यापासून कमी नुकसान पोहोचते. या जातीचे घड मोठे असून सारख्‍या आकाराचे असतात. प्रत्‍येक घडाला सुमारे 6 ते 7 फण्‍या असून एका फणित 15 ते 25 केळी असतात. केळीच्‍या प्रत्‍येक लोंगरात 120 ते 170 फळे असून त्‍याचे सरासरी वजन 25 किलोपर्यंत असते. याजातीच्‍या फळाचा आकार मोठा, गर मळकट पांढ-या रंगाचा असून त्‍यास चांगला वास व गोडी खूप असते. ही जात मर या रोगास प्रतिकारक आहे.
लालवेलची – या जातीची लागवड कोकण विभागात विशेष आढळून येते. या जाती खोडाचा रंग तांबूस, उंच झाड, फळ लहान व पातळ सालीचे असून चव आंबूस-गोड व रंग पिवळा असतो. या जातीच्‍या लोंगरात 200 ते 225 फळे असतात. त्‍यांचे वजन सरासरी 20 ते 22 किलोपर्यंत असते. या जातीची लागवड भारतातील केळीच्‍या इतर जाती लागवडीपेक्षा जास्‍त प्रमाणात आहे.

सफेदवेलची – या जातीचे झाड उंच, खोड बारीक , फळ फार लहान व पातळ सालीचे असून त्‍याचा गर घटट असतो. प्रत्‍येक लोंगरात 180 फळे असून वजन 15 किलोपर्यंत असते. या जातीची लागवड ठाणे जिल्‍हयात आढळून येते.
सोनकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची पाच मिटर, भक्‍कम खोड, फळ मध्‍यम जाड व गोलसर आकाराचे असून त्‍याची चव गोड व स्‍वादिष्‍ट असते. ही जात पना या रोगास बळी पडते. हया जातीची लागवड रत्‍नागिरी भागात आढळून येते.
राजेळी – ही जात कोकण विभागामध्‍ये जास्‍त प्रमाणात आढळून येते. या झाडाची उंची पाच मिटर, फळ मोठे व लांब, लोंगरात 80 ते 90 फळे असतात. त्‍यांचे वजन 12 ते 13 किलो असते. या जातीची कच्‍ची फळे शिजवून खाण्‍यास योग्‍य तसेच सुकेळी करण्‍यासाठी उपयुक्‍त असतात.

बनकेळ – या जातीचे झाड 4 ते 5 मिटर उंच, फळ मोठे, बुटाच्‍या आकाराप्रमाणे सरळ व टोकदार असते. प्रत्‍येक लौंगरात 100 ते 150 फळे असून त्‍यांचे वजन 18 ते 23 किलो असते. ही जात भाजी करिता उपयोगी आहे. या जातीची लागवड कोकण विभागात आढळून येते.

वाल्‍हा – या झाडाची उंची दोन मिटर असून फळे जाड सालीचे असतात. फळांची चव आंबूस गोड असते. प्रत्‍येक लोंगरात 80 ते 100 फळे असतात आणिर त्‍यांचे सरासरी वजन 12 ते 14 किलोपर्यंत असते या जातीची लागवड दख्‍खनच्‍या पठारामध्‍ये विशेषतः आढळून येते.

लालकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची 4 ते 5 मिटर असते. फळ मोठे असून जाड व टणक असते. या जातीची साल लाल व सेंद्री रंगाची असून गर दाट असतो. तसेच चव गोड असते. प्रत्‍येक लोंगरात 80 ते 100 फळे असतात. त्‍यांचे वजन 13 ते 18 किलोपर्यंत असते. केळीच्‍या सर्व जातीमध्‍ये ही जात दणकट म्‍हणून ओळखली जाते. या जातीची लागवड ठाणे भागामध्‍ये आढळून येते.
♥अभिवृध्‍दी :
या पिकाची लागवड त्‍याचे खोडापासून निघणारे मुनवे (सकर) लावून केली जाते.
मुख्‍य झाडाच्‍या वाढीच्‍या काळात आसपास बरीच मुनवे उगवतात. यात दोन मुख्य प्रकार आहेत.
1) तलवारीच्‍या पात्‍याप्रमाणे टोकदार पाने असलेली व दणकट बुंध्‍याची
2) रुंद पानाची गोल किरकोळ बुंध्‍याची.
यापैकी पहिल्‍या प्रकाराची मुनवे नारळाच्‍या आकाराची अर्धा ते एक किलो वजनाचे अभिवृध्‍दी करिता वापरतात.
♥बेणे प्रक्रिया -
बेणे काढणीनंतर 1-2 दिवस ढीग करून ठेवावे.
कंदाच्या सर्व मुळ्या तासाव्यात.
कंदावर 3-4 रिंगा ठेवून कंदावरील डोळे तासावेत.
तासणी केलेले कंद सावलीत 48 ते 72 तास ठेवावेत.
नंतर लागवडीपूर्वी 10 लिटर पाणी + 10 मि.लि. क्‍लोरपायरीफॉस + 10 ग्रॅम बाविस्टीन द्रावणात 30 ते 40 मिनिटे बुडवावेत किंवा शेणा-मातीच्या द्रावणात कंद बुडवून त्यावर प्रति कंद 40 ग्रॅम दाणेदार कार्बोफ्युरॉन शिंपडावे, नंतर लागवड करावी.
वेळेवर लागवडीसाठी कंद उपलब्ध नसतील तर किंवा नवीन वाणाची लागवड करावयाची असेल, तर उतिसंवर्धित रोपे वापरणे फायद्याचे ठरते. अशी उतिसंवर्धित रोपे शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मित खात्रीशीर पन्हेरीतून घ्यावीत. अशी रोपे 45 सें.मी. उंचीची, किमान 6-7 पानेयुक्त असावीत.

♥पूर्व मशागत :
जमीन लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्‍याच्‍या पाळया देऊन भूसभुसीत कराव्‍या.
 नंतर त्‍यामध्‍ये हेक्‍टरी 100 गाडया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत घालून मिसळावे.

♥लागवडीचा हंगाम :
केळीच्‍या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामानाचा परिणाम केळीच्‍या वाढीवर, फळे लागण्‍यास व तयार होण्‍यास लागणारा कालावधी या वरच होत असतो.
जळगांव जिल्‍हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्‍या सुरुवातीस सुरु होतो.
यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते.
जून जुलै मध्‍ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्‍हणतात.
 सप्‍टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्‍हणतात.
जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्‍ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्‍पन्‍न मिळते. या लागवडी मुळे केळी 18 महिन्‍याऐवजी 15 महिन्‍यात काढणे योग्‍य होतात.
महाराष्ट्र राज्यात दर वर्षी नवीन लागवड केली जाते. अलीकडे उतिसंवर्धित रोपे आणि ठिबक सिंचनाचा वापर यामुळे शेतकरी पहिला आणि क्वचित दुसरा खोडवा घेतात. 70 टक्के लागवड 15 जून ते 15 जुलै या कालावधीत होते. या लागवडीस "मृग बाग' लागवड असे म्हणतात.

♥लागवड पध्‍दत :
लागवड करताना 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात.
दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता 1.25 1.25 किंवा 1.50 1.50 मीटर असते.

♥लागवड -
केळीची लागवड योग्य अंतरावर खड्डे घेऊन किंवा खोल सरी काढून करावी. लागवडीची सरी पद्धत सुलभ व स्वस्त आहे. केळीलागवड चौरस पद्धतीने 1.5 X 1.5 मी. अंतरावर किंवा जोड ओळ पद्धतीने 0.9 मी. बाय 2.1 मी. बाय 1.5 मी. अंतरावर करावी. दोन्ही पद्धतींमध्ये एक हेक्‍टर क्षेत्रावरील रोपांची संख्या ही 4444 इतकी असते. जोड सरळ पद्धतीने केळी लागवड केल्यास दोन ओळींच्या मधल्या पट्ट्यात चवळी, मूग, उडीद, सोयाबीन यांसारखी कमी लागवडीची पिके आंतरपीक म्हणून घेता येतात, तसेच ताग किंवा धैंचा या हिरवळीच्या पिकांचाही आंतरपीक म्हणून वापर करता येतो. याबरोबरच जोड ओळ पद्धतीमुळे ठिबक सिंचनाच्या खर्चातही 35 ते 40 टक्के बचत करता येते.
काही ठिकाणी खड्डे (1 X 1 X 1 फूट) घेऊन करतात, तसेच नांगराच्या खोल सरीत केली जाते. ही सोपी व स्वस्त पद्धत आहे. चौरस (1.5 X 1.5 मीटर) किंवा (1.35 X 1.35 मीटर) आयताकृती (1.5 X 1.35 मीटर) किंवा (1.35 X 1.80) किंवा (1.5 X 1.2 मीटर) पद्धतीने लागवड करावी. केळी पिकासाठी 1.5 X 1.5 मीटर अंतर ठेवावे. जोड ओळ पद्धतीत 0.9 X 1.5 X 2.1 मीटर अंतरावर लागवड करावी. हेक्‍टरी झाडांची संख्या -
1.50 X 1.50 मीटर - 4,444 झाडे
1.35 X 1.35 मीटर - 5,400 झाडे
1.50 X 1.35 मीटर - 4,938 झाडे
1.20 X 1.20 मीटर - 5,555 झाडे
0.90 X 1.50 स 2.10 मीटर - 4,444 झाडे

♥आंतरपिके :
 केळीत घ्‍यावयाच्‍या मिश्र पिकांची निवड करतांना मुख्‍य पिकातील अंतर, अन्‍नद्रव्‍याचा पुरवठा मशागतीच्‍या पध्‍दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा वगैरे बाबींचा प्रामुख्‍याने विचार करणे अगत्‍याचे ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक 16 ते 17 महिन्‍याने झाल्‍यावर आणि बागेतील 85 ते 90 टक्‍के घड कापले गेल्‍यावर केळीच्‍या बागेत
गहू हरबरा सारखी रब्‍बी हंगामातील पिके घेतात.
अथवा कांद्याचे बियाण्‍यासाठी कांदे लावतात.
कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्‍या बागेत केळीची पिके लावतात.
♥किड व रोग
केळीच्‍या झाडावर पनामा रोग, शेंडे झुपका इत्‍यादी महत्‍वाचे हानीकारक रोग विशेष करुन पडतात. किड त्‍या मानाने कमी पडते. रोग व किडी विषयांची माहिती संक्षेपात खालीलप्रमाणे आहे.
पनामा (मर) रोग
नुकसान : पाने वाढतात. फळे खराब होतात, अयोग्‍य निचरा व भारी जमिन यामुळे जास्‍तीत जास्‍त अपाय होतो. हा रोग कवकामुळे होतो.
उपाय :
1)बसराई, लालकेळ, हरीसाल व पुवन या जाती रोगप्रतिकारक आहेत.
2)मॅक्‍युरी, क्‍लोराईड (2000 पीपीएम)  दर 20 लिटर पाण्‍यात मिसळून वापरावे.
शेंडा झुपका (बंचीटॉप )
नुकसान : रोग विषाणुमुळे होतो.
झाडे खुजी पाने तोकडी होतात.
या रोगाचा प्रसार रोगट कंद व मावा किडीमळे होतो.
उपाय :
1)निरोगी कंद व मुनवे वापरावेत.
2)रोग प्रतिकारक जाती बसराई लागवड करावी.
3)मावा किडीचा बंदोबस्‍त करावा.
4) रोगट झाडे नष्‍ट करावीत.

घडांच्‍या दांडयाची सडण
नुकसान : मुख्‍य दांडा सडतो व काळा पडतो.
कवकामुळे रोग पडतो सुर्याकडील घडावील जास्‍त स्‍पष्‍ट चिन्‍हे.
उपाय : घडावर झाडाची पाने बांधावित. 4.4.50 च्‍या बोर्डो मिश्रणाच्‍या घड लहान असताना फवारा द्यावा.
किड व खोड भुंगा
नुकसान : या भुंग्‍याची अळी केंद व खोड यांचा भाग पोखरते.
उपाय : 1)झाडावर पॅरीसगीन औषध अधिक धान्‍याचे पीठ (1.5) यांच्‍या विषारी गोळया करुन कंदाचे जवळ टाकतात.
2)दुषित कंद नष्‍ट करावेत.
पानावरील भुंगे
नुकसान : पावसाळयातील पाने व फळे कोरतात आणि खातात.
पानावरील मावा
नुकसान : उष्‍ण व सर्द दिवसात पाने व कोवळया फळातील रस पितात.
फळावरील तुडतुडे
उपाय : क्लोरपायरीफोस वापरा आणि रस शोषणाऱ्या किडीसाठी इमिडाक्लोप्रिड वापरा.
मोहोर फळधारण व हंगाम :
लागवडीनंतर 10 ते 12 महिन्‍याच्‍या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो.
बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्‍यात बाहेर पडतात.
वाल्‍हा जातीत 6 ते 7 महिने लागतात.
लालवेलची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात.
 तर लालकेळीस लॉंगर येण्‍यास 14 महिने लागतात.
झाड चांगले वाढलेले असल्‍यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्‍यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो. व
9 ते 10 महिन्‍यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व
3 ते 5 महिन्‍यात घड तयार होतो. थंडीच्‍या दिवसात घड तयार होण्‍यास जास्‍त काळ लागतो.
घडाने आकार घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या टोकास असलेले वांझ केळफूल त्‍या घडातील केळयांच्‍या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात. त्‍या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्‍यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्‍याचे वजन वाढते.
♥केळीचा हंगाम
मुख्‍यतः महाराष्‍ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व
खानदेश भागात सप्‍टेंबरमध्‍ये असतो.
फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्‍यावरच्‍या धारा (कडा) मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे.
पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्‍यामुळे तो वाहतूकीस योग्‍य ठरतो.
त्‍यासाठी 75 टक्‍के पक्‍व असेच घड काढतात. त्‍यामुळे ते लांबवर वाहतूक करता येते.
वाहतूक :
 बारमाही बहराचे वरदान केळी पिकाला लाभलेले असले तरी जलद गतीने नाशवंत फळांच्‍या शापांचे गालबोटही या पिकास लागले आहे. झाडावर केळ पूर्णपणे वाढून तयार झाल्‍यावर घड कापून जलद गतीने ग्राहकापर्यंत पोहचविण्‍याची गरज असते.
केळीची घड त्‍यांच्‍या पानाचा थर देऊन वाघीणी किंवा ट्रक मध्‍ये रचली जातात.
 2 ते 7 दिवसापर्यंतच्‍या रेल्‍वे प्रवासात केळी आपोआप पिकतात व स्‍थानकावर पोहोचविल्‍यावर त्‍वरीत त्‍याची 2 ते 4 दिवसांत विल्‍हेवाट लावावी लागते.
केळी हिरवी व पूर्ण वाढीची सोडली तरीही आपोआप प्रवासात पिकतातञ किंवा
धुरी वा इथ्राइलीन गॅसच्‍या साहारूयाने पिकविले जातात.
 केळीच्‍या घडाच्‍या दांडयाला पॅराफिन मेण, व्‍हॅसलिन किंवा चुना लावतात. त्‍यामुळे फळे जास्‍त काळ टिकतात व अधिक आकर्षक रंगाचे होतात. अर्धा किलो मेन 100 घडयांना पुरते.
उत्‍पादन व विक्री :
प्रदेश, जात व जमिनीच्‍या प्रकारानुसार केळीच्‍या उत्‍पादनाचे प्रमाण बदलू शकते.
बसराई जातीचे खानदेश भागात अंदाजे उत्‍पन्‍न 335 ते 450 क्विंटल प्रति हेक्‍टरी सरासरी येते.
पूणे व ठाणे भागात 590 ते 650 क्विंटल प्रति हेक्‍टरी सरासरी येते. राज्‍य व्‍यापार महामंडळ, मुंबईतर्फे रशिया, जपान, इटली, कुवेत, वगैरे देशात केळीची निर्यात केली जाते.
घाऊक व्‍यापारी केळयांची खरेदी जागेवरच केळी बागेत घडांची संख्‍या आकारमान विचारात घेऊन करतात.
तथा सर्वर मोठया पेंठात त्‍यांची वजनावर विक्री होते.
किरकोळ विक्रेते भटटीचा तयार माल विकत घेऊन डझनावर किंवा किलोवर विक्री करतात.

♥बागेची निगा

♥पूर्व मशागत -
केळी हे द्विवार्षिक पीक असल्याने जमिनीच्या उतारास आडवी खोलवर नांगरणी करून नंतर कुळवाच्या पाळ्या देऊन सपाट भुसभुशीत करावी. त्याचबरोबर त्यात हेक्‍टरी 100 गाड्या कंपोस्ट खत मिसळावे.
1)बागेतील जमिन स्‍वच्‍छ व भुसभुशित ठेवावी.
2)त्‍याकरिता सुरुवातील कोळपण्‍या द्याव्‍यात.
3)पुढे हाताने चाळणी करावी.
4)केळीच्‍या बुंध्‍यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्‍या वेळी काढून टाकावीत.
5)लागवडीनंतर 4 ते 5 महिन्‍याने झाडांच्‍या खोडाभोवती मातीवर थर द्यावा.
6)आवश्‍यकता भासल्‍यास घड पडल्‍यावर झाडास आधार द्यावा.
7)सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्‍हणून केळीच्‍या घडाभोवती त्‍याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्‍याची प्रथा आहे.
8)थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्‍याच्‍या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.
9)केळी पिकाला इतर फळपिकांच्‍या मानाने जास्‍त पाणी लागते. दिवसेंदिवस पर्जन्‍यमान कमी होत आहे व त्‍यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्‍यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे. क्षेत्र वाढीसाठी उपलब्‍ध पाण्‍याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्‍यात वाढही शक्‍य आहे.
केळी हे सर्व फळांमध्‍ये स्‍वस्‍त आहे व त्‍यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्‍त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्‍ध केला जातो. वाहतूकीसाठी रेल्‍वेकडून वॅगन्‍स उपलब्‍ध केल्‍या जातात. पण त्‍यात अल्‍पशी सवलत आहे. केळी उत्‍पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्‍या दराने करणेची व्‍यवस्‍था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.

केळी खते व पाणी नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥सेंद्रीय खते – शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड
♥जैवकि खते – अॅझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झााड केळी लागवडीच्‍या वेळी

♥रासायनिक खते

केळी खते व वरखते नियोजन असे कराल

या झाडाची मुळे उथळ असतात. 
त्‍यांची अन्‍नद्रव्‍यांची मागणी जास्‍त असते.
 त्‍यामुळे वाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात (पहिले वार महिने) नत्रयुक्‍त जोरखताचा हप्‍ता देणे महत्‍वाचे ठरते. 

प्रत्‍येक झाडास 200 ग्रॅम 
नत्र 3 समान हप्‍त्‍यात लावणीपासून 
दुस-या तिस-या व चौथ्‍या महिन्‍यात द्यावे. 

प्रत्‍येक झाडास प्रत्‍येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. 
शेणखता बरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्‍फेट प्रत्‍येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्‍त ठरते.

केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद व 200 ग्रॅम पालाश देण्‍याची शिफारस करण्‍यात आलेली आहे. 

जमिनीतून रासायनिक खते देताना त्‍यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्‍यासाठी खोल बांगडी पध्‍दतीने किंवा कोली घेवून खते द्यावी.

स्‍फूरदाची संपूर्ण मात्रा 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्‍फेट व 10 किलो शेणखत केळी लागवडीच्‍या वेळी जमिनीतून द्यावे.

♥सेंद्रिय खतांचा वापर-
केळी पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर हे केळी उत्पादनाच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपीकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. केळीबागेस पीक लागवडीपूर्वीच हेक्‍टरी 100 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे किंवा प्रत्येक खोडास किमान दहा किलो शेणखत वापरणे अत्यंत गरजेचे आहे. गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रत्येक खोडास किमान पाच किलो गांडूळखत वापरावे. निंबोळी पेंड उपलब्ध असल्यास प्रत्येक खोडास अर्धा ते एक किलो निंबोळी पेंड वापरावी.
♥हिरवळीची खते हा सेंद्रिय खतांचा अतिशय स्वस्त असा पर्याय आहे. यात केळी लागवडीपूर्वी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडणे किंवा केळीलागवड केल्यावर दोन ओळींमध्ये हिरवळीच्या पिकांची लागवड करून फुलो-यात आल्यानंतर केळीच्या खोडाजवळ गाडणे अशा दोन प्रकारे हिरवळीची खते वापरता येतात. हिरवळीच्या पिकांमध्ये ताग, धैंचा, चवळी, उडीद, मूग इ. पिकांचा वापर करता येतो. हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीची सुपीकता तर टिकविली जातेच, त्याचबरोबर मुख्य पिकाला नत्राचा पुरवठा सुद्धा होतो. 

♥जिवाणू खतांचा वापर 

जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी व केळी पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांबरोबर जिवाणू खतांचा वापर करणे अत्यंत आवश्‍यक आहे. केळीसाठी "ऍझोस्पिरीलम' या नत्र स्थिर करणाऱ्या व "पी.एस.बी.' या स्फुरद विरघळविणा-या जिवाणू खतांचा प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति झाड (एकूण 50 ग्रॅम प्रति झाड) केळी लागवडीच्या वेळेसच वापर करणे गरजेचे आहे. जिवाणू खतांच्या वापरामुळे वातावरणातील नत्र स्थिर करून तो पिकाला उपलब्ध करून दिला जातो, तर जमिनीतील स्थिर झालेला स्फुरद पिकाला उपलब्ध करून दिला जातो.
 

♥टिश्यूकल्चर केळीसाठी फर्टिगेशन 

ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबतच विद्राव्य खते देण्याच्या पद्धतीस फर्टिगेशन असे म्हणतात. 

टिश्यूकल्चर केळी लागवड हे आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे त्यास सर्व आधुनिक तत्वांची जोड देणे गरजेचे आहे. 

टिश्यूकल्चर केळी रोपांजवळ कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य साठविलेले नसल्याने लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी त्वरीत फर्टिगेशन सुरू करणे गरजेचे आहे. 

आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून पारंपारिक खतांचा वापर करण्यात येत आहे. परंतु या खतांची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे आणि ती पूर्णपाने पाण्यात विरघळणारी नसल्याने विद्राव्य खते वापरणे हिताचे आहे. 

त्याचप्रमाणे पारंपारिक खतांची कार्यक्षमता ३० ते ५० % असून विद्राव्य खतांची कार्यक्षमता ८० ते ९० % आहे. 

त्याचप्रमाणे विद्राव्य खते ही आम्लधर्मीय असल्याने क्षारता की करण्यास मदत करतात.
 विद्राव्य स्वरूपातील खते वापरावयाची झाल्यास १० ते २० टक्के अन्नद्रव्याची बचत होवू शकते.
♥फर्टिगेशन खतांची मात्रा व वेळापत्रक : 

नत्र २०० ग्रॅम, 

स्फुरद : ६० ग्रॅम , 

पालाश : २८० ग्रॅम प्रति झाड. 

या खतांच्या मात्र फक्त मार्गदर्शनासाठी असून मातीपरीक्षण अहवालानुसार व प्रत्यक्ष अनुभवानुसार त्यात बदल करावेत.
♥केळीपाणी नियोजन असे कराल

केळीला भरपूर पाणी लागते.

पाणी खोडाजवळ साठून राहणार नाही. याची काळजी घेणे आवश्‍यक असते. 

जमिनीचा मगदूर व झाडांच वय लक्षात घेवून पाण्‍याचे पाळयामधील अंतर ठरवितात. 

भारी सुपिक व खोल जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेमी पाणी दरपाळीस लागते. 

उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांनी व 

हिवाळयात 9 ते 15 दिवसांनी पाणी देतात. 

अतिकडक उन्‍हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे लागते. 

केळीचे एक पिक घेण्‍यास (18 महिने) 45 ते 70 पाण्‍याच्‍या पाळया लागतात. 

पाण्‍याची कमतरता असल्‍यास केळीच्‍या वाफयाच्‍या मधल्‍या जागेत तनिस, गवत, पालापाचोळा व पॉलीथीनचे लांब तुकडे यांचे आच्‍छादन करावे. त्‍यामुळे पाण्‍याच्‍या दोन पाळया चुकविता येतात.
♥पाणी व्‍यवस्‍थापन :

 केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मि. पाणी लागते. 

केळीसाठी ठिबक सिंचन अत्‍यंत उपयुक्‍त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्‍म नलीका पध्‍दतीपेक्षा ( मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्‍य असते.
बाष्‍पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्‍था इ. बाबींवर केळीची पाण्‍याची गरज अवलंबून असते. 

ठिबक सिंचनामुळे पाण्याची 40 ते 50 टक्के बचत होऊन अधिक क्षेत्र पाण्याखाली येऊ शकते, केळीच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढ होते. 

जमिनीतील हवा व पाणी यांचे प्रमाण योग्य राहून केळीची जोमदार वाढ होते. केळीचे घड 25 ते 30 दिवस लवकर कापणीस येतात. 

उन्हाळ्यात केळीच्या बागेत थंड हवामान राहून, उष्णतेपासून बागेचे संरक्षण होते, तसेच केळीसाठी लागणारी अन्नद्रव्यांची मात्रा विद्राव्य खतांच्या माध्यमातून देता येते. विद्राव्य खते वापरावयाची नसल्यास युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश ही पारंपरिक खते पाण्यात विरघळवून ठिबकद्वारे देता येतात.
ठिबक सिंचनाचा आराखडा बनविताना जमीन, पाणी आणि पीक या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीचा प्रकार म्हणजेच उथळ (30 सें.मी. खोल), मध्यम (60 सें.मी. खोल), भारी (90 सें.मी. खोल), तसेच पाणीधारण शक्ती, उपलब्ध पाणी, पाणी जिरण्याचा वेग इत्यादी बाबींची निश्‍चिती करणे आवश्‍यक असते. पाण्याची प्रत त्यामध्ये विरघळलेल्या क्षारांवर अवलंबून असते, त्यासाठी पाण्याचा सामू, विद्युतवाहकता, सोडिअम आणि बोरॉनचे प्रमाण तपासणे आवश्‍यक असते.
ठिबकमधून केळीच्या बागेला प्रति दिनी किती पाणी द्यावे हे दिवसाचे बाष्पीभवन, पिकाच्या दोन ओळींतील अंतर, दोन झाडांच्यामधील अंतर, तसेच ठिबकने ओला करावयाचा जमिनीचा भाग, इत्यादींच्या आधारे काढता येते. केळीची पाण्याची गरज ही वाढीनुसार आणि दररोजच्या हवामानानुसार बदलत असते.
♥केळीसाठी ठिबक सिंचन पद्धती - 

1) सलग लागवड पद्धत - या पद्धतीत 5 5 फूट अंतरावर केळीची लागवड करून प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी आणि प्रत्येक झाडासाठी एक तोटी द्यावी लागते.
2) जोड ओळ पद्धत - या पद्धतीत लगतच्या दोन ओळींतील अंतर तीन फूट आणि मध्ये सात फुटांचा पट्टा व दोन झाडांतील अंतर पाच फूट असते. या पद्धतीत तीन फुटांच्या दोन ओळींमध्ये उपनळ्या टाकून, त्यावर पाच फूट अंतरावर तोट्या बसवाव्यात. अशा प्रकारे दोन ओळींसाठी फक्त एकच उपनळी व दोन समोरासमोरील रोपांसाठी एकच तोटी वापरून उपनळ्या व तोट्यांच्या खर्चात निम्म्याने बचत करता येते.

संकलीत!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

वांगी किड व रोग नियंत्रण Brinjal pest & disease control